Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site
कच्चा लिंबू – एकोणीसशे ऐंशीच्या दशकात मुंबईतील गिरगावातील चाळीत राहात असलेल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात मतिमंद मूल जन्माला आल्यावर आणि तो केवळ शरीराने मोठा झाल्यावर या जोडप्याच्या आशाआकांक्षांची राखरांगोळी होते. चित्रपटा बद्दल अजून जाणून घेण्यासाठी नक्की पहा.
एकोणीसशे ऐंशीच्या दशकात मुंबईतील गिरगावातील चाळीत राहात असलेल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात मतिमंद मूल जन्माला आल्यावर आणि तो केवळ शरीराने मोठा झाल्यावर या जोडप्याच्या आशाआकांक्षांची राखरांगोळी होते. साधे शरीरसुख त्यांना घेता येत नाही. असा प्लॉट असलेला कच्चा लिंबू हा चित्रपट अभिनय, कलादिग्दर्शन आदी आघाड्यांवर उत्तम उतरूनही कालबाह्य मूल्ये, सोयीचा शेवट आणि बदललेल्या जगाचे भान नसल्या कारणाने मर्यादित बनला आहे. कथेतील काळ कधीचाही असला तरी त्याचा आस्वाद आजच्या काळातील रसिकच घेणार आहेत, त्यामुळे जनमाध्यमांचा भाग असलेल्या चित्रपट कलेत ते भान असावेच लागते.
मराठी साहित्यातील उत्तर आधुनिक कथांत प्रामुख्याने निम्नमध्यमवर्गीय समाज जीवनाचे प्रतिबिंब टिपले गेले. त्या काळातील जयवंत दळवी हे मोठे साहित्यिक होते आणि त्यांचे साहित्यही या नियमाला अपवाद नव्हते; त्यांनी तेव्हाचे धाडसी, नवीन विषय हाताळले तरी! ते साहित्यकृतींच्या माध्यमांतरासाठी प्रसिद्ध होते. म्हणजे कथेची कादंबरी, कादंबरीचे नाटक असे ते करीत. आपल्याच 'ऋणानुबंध' या कादंबरीवरून त्यांनी 'नातीगोती' हे तेव्हा गाजलेले नाटक त्यांनी लिहिले. ते पुढे हिंदीतही आले.
आता याच साहित्यकृतीवरील चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता प्रसाद ओक याने दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. अभिनेत्याला दिग्दर्शक बनावेसे वाटणे, गायकाला अभिनेता व्हावेसे वाटणे हे डॉक्टरला गायक व्हावेसे वाटणे यापेक्षा फार वेगळे नाही आणि प्रत्येकाला तो अधिकार आहे. त्याने आपला चित्रपटाच्या तंत्र आणि कलेवर इतर अनेक नवीन दिग्दर्शकांच्या तुलनेत बरी पकड असल्याचे दाखवून दिले आहे. अर्थात त्याला अत्यंत उत्तम कलावंत, तंत्रज्ञ याची साथ मिळाली आहे. मात्र यातील प्लॉट, त्यातील वास्तव आणि काळ याबरोबरच त्यातील नैतिक संघर्षाच्या पातळीवर गोंधळाचा वाटतो.
बाप आणि मुलगा किंवा मुले आणि पालक यांच्यातील संघर्षाच्या शेकडो कहाण्या आहेत आणि असतील. बापानेच मुलाच्या जिवावर उठणे, त्याने आपल्या जगण्यालाच नाकारणे हे उत्तम प्लॉटचे नमुने होऊ शकतात. तसेच, यातील अपराधी भावनेची थीम तर अनेक मोठ्या कलाकृतींचा ऐवज ठरली आहे. मात्र, थीम प्रत्यक्ष पात्राने बोलण्याऐवजी ती केवळ जाणवण्याच्या पातळीवर ठेवली असती तर बरे झाले असते.
यातील पात्रे अभिनयातून जिवंत वाटत असली तरी असे लोक कुठे आहेत असे निदान श्रीकांत पंडित या पात्राकडे पाहून वाटते. एकेकाळी ही नितीमूल्ये होती, आता नाहीत. म्हणजे जग अनैतिक बनले असे नव्हे. तर प्रत्येक काळ आपले स्वतंत्र मूल्य घेऊन येतो. मंतिमंद याची व्याख्या, संशोधन, समज आणि मदतीचे जाळे बदलले आहे, आणि लैंगिकतेचेही तेच आहे. ही कथा त्या काळात ठेवणे ही प्लॉटची गरज नाही.
हा कृष्णधवल चित्रपट बनवण्याचा प्रयोग का आणि ही कथा ऐंशीच्या दशकात असण्याचे कारण काय, हे प्रश्न कायम राहतात. त्याची उत्तरे कथेची किंवा दिग्दर्शकाची सोय या पलीकडे काहीही सापडत नाही.
मराठी-विश्व एक निशुल्क मुक्तांगन आहे. आपल्या सुचना, साहित्य या कम्युनिटीवर, मराठीविश्व@जीमेल.काँम वर किंवा थेट मराठी विश्व.कॉम लोग इन करून पोष्ट करू शकता.... आपल्या प्रतिक्रिया आम्हाला अवश्य कळवा.